Wednesday, July 3, 2019

प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा अंतिम संदेश

आज प पु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करू या 💐💐

प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा अंतिम संदेश 

.
१. मुक्तीचा लाभ करुन घेणे हे मनुष्यजन्माचे कर्तव्य आहे.
२. त्याकरिता प्रथम मन स्थिर व्हावे या उद्देशाने वर्णाश्रमविरहित धर्माचे यथाशास्त्र आचरण झाले पाहिजे.
३. वेदान्ताचे श्रवण, मनन, निदिध्यासन नित्य करावे.
४. मुख्यत: लक्षपूर्वक श्रवणाने मनातील आसक्ती कमी होईल.
५. सात्विक प्रवृत्तीनेच मानवाची उन्नती होते.
६. सात्विक प्रवृत्ती होण्याकरिता आहार हा हित, मित व मेध्य म्हणजे पवित्र असण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
७. आपली प्रकृति सात्विक झाली आहे हे ओळखण्याची खूण अशी, की स्वधर्मावर दृढ श्रद्धा बसून स्नान, संध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ हे वेळेवर करणे, अतिथिसत्कार, गोसेवा, मातापितरांची सेवा ही हातून घडणे, कथा-किर्तन, भजन-पुराण यांचे श्रवण होणे, सर्वांबरोबर गोड बोलणे, दुसऱ्याचे नुकसान होईल असे न वागणे, स्त्रियांनी सासरी राहून सासू-सासरे व इतरही वडील माणसे यांच्या आज्ञेत पतीची दृढनिष्ठेने सेवा करणे इ. गुण आपल्यामध्ये येणे. आपली प्रकृति सात्विक बनल्याची ही चिन्हे आहेत.
८. उदरनिर्वाहाकरिता व्यापार, शेती, नोकरी, कोणताही व्यवसाय केला तरी वेदविहित कर्म व गुर्वाज्ञापालन कधीही सोडू नये.
९. स्वकर्म केले तरच अंत:करण शुद्ध होते.
१०. अंत:करण शुद्ध झाले तर उपासना स्थिर होते.
११. उपासना स्थिर झाली तर मनाला शांति मिळते.
१२. आणि मनाची गडबड थांबली म्हणजे आत्मज्ञान होऊन मोक्षाचा लाभ होतो. याप्रमाणे जो वागेल तो शेवटी पूर्ण सुखी होईल.

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा व स्तोत्रे.
१) द्विसाहस्त्रीश्रीगुरुचरितम्सटीकम् (मूळ १८८९)- रचनास्थळ माणगांव, महाराष्ट्र
चूर्णिका (टीका १८९९)- रचनास्थळ प्रभास वद्वारका, गुजरात.
२) श्रीदत्तपुराण (संस्कृत) (१८९२)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल
३) नर्मदालहरी (१८९६)- रचनास्थळ हरिद्वार, उत्तरांचल
४) श्रीदत्तलिलामृताब्धिसार (मराठी) (१८९७)- रचनास्थळ पेटलाद, मध्यप्रदेश
५) कूर्मपुराणाचेदेवनागरीत लिप्यंतर (१८९८)- रचनास्थळ तिलकवाडा, गुजरात
६) अनसूयास्तोत्र (१८९८)- रचनास्थळ शिनोर, गुजरात
७) श्रीदत्तपुराणटीका (१८९९)- रचनास्थळ सिद्धपूर, गुजरात
८) श्रीदत्तमाहात्म्यव त्रिशति गुरुचरित्र (मराठी) (१९०१)- रचनास्थळ मपत्पूर, मध्यप्रदेश
९) समश्लोकीगुरुचरित्र (१९०३)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल
१०) लघुवासुदेवमननसार (मराठी) (१९०३)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल
११) सप्तशतिगुरुचरित्रसार (मराठी) (१९०४)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल
१२) श्रीकृष्णालहरी (५१श्लोक) (१९०५) श्रीगुरुस्तुति- स्तोत्र- रचनास्थळ गाणगापूर, कर्नाटक
१३) दत्तचंपू वकरुणात्रिपदी (१९०५)- रचनास्थळ नरसी, महाराष्ट्र
१४) दव्यर्थीषडाननस्तोत्र व कुमारशिक्षा (१९०७)- रचनास्थळ हंपी, कर्नाटक
शिक्षात्रयम् (संस्कृत) युवाशिक्षा (१९०८)- रचनास्थळ मुक्त्याला, आंध्रप्रदेश
वृद्धशिक्षा (१९०८)- रचनास्थळ मुक्त्याला, आंध्रप्रदेश
१५) गुरुसंहिता (समश्लोकी गुरुचरित्र) (१९०७)- रचनास्थळ तंजावर, आंध्रप्रदेश
१६) स्त्रीशिक्षा (मराठी) (१९०८)- रचनास्थळ मुक्त्याला, आंध्रप्रदेश
१७) गंगेचीस्तुती (१८९६)- रचनास्थळ हरिद्वार, उत्तरांचल
१८) नर्मदास्तुती- रचनास्थळ नेमावर, मध्यप्रदेश
१९) अभंग-मित्रमित्रभांडती- रचनास्थळ चिखलदा, मध्यप्रदेश
२०) सिद्धसरस्वतीस्तुती- रचनास्थळ सिद्धपूर, गुजरात
२१) कृष्णावेणीपंचगंगा स्तोत्र- रचनास्थळ मंडलेश्वर, मध्यप्रदेश
२२) अखंड आत्माअविनाशी दत्तस्तोत्र- रचनास्थळ गाणगापूर, कर्नाटक
२३) साकारतास्तोत्र (१९०६)- रचनास्थळ बडवानी, मध्यप्रदेश
२४) कृष्णालहरीसंस्कृत टिका- रचनास्थळ तजांवर, तमिळनाडू
२५) गोदावरीस्तुती- रचनास्थळ सप्तगोदावरी, आंध्रप्रदेश
२६) वैनगंगास्तोत्र (१९०९)- रचनास्थळ पवनी, महाराष्ट्र
२७) भूतपिशाचस्तोत्र- रचनास्थळ गुर्लहोसूर, कर्नाटक
२८) तुंगभद्रास्तुती, त्रिपुरांतकेश्वर स्तोत्र (१९१०)- रचनास्थळ हावनुर, कर्नाटक
२९) षट्पंचशिकावेदान्तपर स्तोत्र- रचनास्थळ हरिहर, कर्नाटक
३०) दत्तमहात्मन स्तोत्र- रचनास्थळ जैनापूर, कर्नाटक
३१) श्रीपादश्रीवल्लभ स्तोत्र (१९११)- रचनास्थळ कूरवपूर, कर्नाटक
३२) जगदंबास्तुती- रचनास्थळ तुळजापूर, महाराष्ट्र

प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे कंठातील वाडमयीन हार
प.प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या काही प्रतिमा आपण पाहतो. वंदन करतो. त्यामध्ये स्वामी महाराजांची दंड, कमंडलू, कौपिन, छाटी धारण केलेली भस्म विभूषित एक उभी प्रतिमा आहे. या उभ्या प्रतिमेत महाराजांच्या गळ्यात एक श्लोकबद्ध हार आहे. इ. स. १९१३ मध्ये वैशाखात प. प. गुळवणी महाराज श्री क्षेत्र गरुडेश्वरी आले. येताना त्यानी श्री दीक्षित स्वामी यांनी रचना केलेल्या हारबद्ध व श्लोकबद्ध असलेले एक छायाचित्र आणलेले होते. व त्यांनी ते थोरले महाराजांना अर्पण केले. प. प. थोरल्या महाराजांनी ते श्लोकबद्ध हाराचे चित्र पहिले व त्याचा स्वीकार करून प. प. दीक्षित स्वामी महाराजांना परत करणेस सांगितले. तो श्लोक खालील प्रमाणे,

मेशं केशं सुशंभु, भुवनवनवहं,  मारहं रत्नरत्नं ।
वंदे श्री देवदेवं सगुणगुरुगुरुं, श्रीकरं कंजकंजम् ।। 
मामज्ञं मत्तभर्भ भवदव सुवहं वासनासर्वसंधे |
मातः पातः सुतस्ते वहरहसि हरे देशिके  शिष्य शिष्यम्  ||
                                     
१) मेशं- लक्ष्मीचा ईश, अर्थात विष्णू. 
२) केशं-  ब्रम्हा जो श्रीष्टीकर्ता आहे.      
३) सुशंभु- मोक्षाचे सुख देणारा  शंभू. 
४) भुवन-वन-वहं- १४ भुवनांचा धारण करणारा, पालन करणारा विष्णू.  
५) मारहं- कामदेवाला मारणारा अर्थात शिवस्वरूप. 
६) रत्नरत्नं- श्रेष्ठा मध्ये श्रेष्ठ अर्थात प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. 
७) श्री देवदेवं- देवांचा जो देव तो महादेव, भगवान शंकर.
८) सगुणगुरुगुरुं- सगळ्या गुरूंचा गुरु म्हणजे सगुण  परमेश्वर. 
९) श्रीकरं- वेदवेदांतविद्या शिकवून शिष्यान। तेजस्वी बनवणारा 
१०) कंजकंजम् - करकमळात कमंडलू धारण करणारा. 
११) मामज्ञं- अज्ञ मा वहं म्हणजे अज्ञानी अशा मला ब्राम्हाकडे घेऊन जावे. 
१२) मत्तभर्भ- मत्तम्- अर्भम्  अर्थात मद मोह ग्रस्त बालकास 
१३) भवदव सुवहं- संसाररुपी दावानलातून बाहेर नेणारा 
१४) वासनासर्वसंधे-  वासनांच्या जाळ्यात 
१५) मातः पातः- तुझा पुत्र आहे, माझे पतन न होवो. 
१६) शिष्य शिष्यं- शिष्यांचा शिष्य 

सरळ अर्थ:

"ब्रम्हा विष्णू व शिवस्वरूप चतुर्दश म्हणजे चौदा भुवनांचा पालनकर्ता, विष्णूस्वरूप, कामदेवांचा भस्म करणारे शिवस्वरूप, परमहंस परिव्राजकामध्ये श्रेष्ठ श्री सदाशिवरूप, सगुण, गुरूंचे गुरु, कर कमळात कमंडलू धारण करणारे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती याना मी वंदन करतो. वासनांच्या जाळ्यात माझे पतन होऊ देऊ नका. मला अधःपतित करू नका. मी तुमचा पुत्र आहे. संसाररूपी दावानलातून मला बाहेर काढा. हे विष्णू स्वरूप गुरुमाते, मला एकांतात ज्ञानोपदेश देऊन शिष्यांचा शिष्य बनवा."

अशा प्रकारे हा श्लोकबद्ध हारबंध म्हणजे एका पूर्णपात्र शिश्योत्तमाने कृपावंत सद्गुरुकडे मागितलेले हे आर्जवपूर्ण गाऱ्हाणे आहे. हे मनुष्य जीवनाचे सर सर्वस्व आहे. हि मागणी लौकिक किंवा ऐहिक नसून शाश्वत ज्ञान सत्चरित्राचे पालन करण्याची प्रार्थना आहे. शब्द विकारांवर मात करून ईश्वरचरणी मन केंद्रित करून आत्मिक विकास आणि उद्धार करून घेण्यासाठी, एकांतामध्ये गुरुमुखातील ज्ञान ग्रहण करणेसाठी गुरूंना केलेली ही आर्त प्रार्थना आहे.

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती
जय जय श्रीमदगुरूवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।।
वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।।

सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।।
वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।।

मुक्ताहारो ब्रह्म्वाह्को वैराडरूपधर ।। 
भक्तराज हृद्ध्वांत तमोहृत स्वीकुरु मां च हर ।। जय जय ।। २ ।।

पक्षस्यैके वातेनैते भीता: काकाधा: ।। 
पलायितास्ते द्रुतं प्रभावात् भवंति चादृश्या: ।। जय जय ।। ३ ।।

एवं सति खलु बालस्तेहं ग्रसित: कामाधै: ।
मातस्त्वरया चोध्दर कृपया प्रेषितशांत्याधै: ।। जय जय ।। ४ ।।

दासस्ते नरसिंहसरस्वती याचे श्रीचरणम् ।।
भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ।। जय जय ।। ५ ।।

Tuesday, July 2, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३ जुलै  🌸*

*सद्‍गुरूची  कामगिरी .*

सद्‍गुरूची कामगिरी कोणती ? 
आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्‍गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्‍गुरू सांगतात. सद्‍गुरू आपल्याला मार्गाला लावतात. 

स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्‍गुरू जागे करण्याचे काम करतात. 

मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्‍गुरू खरोखर केला असे म्हणावे. 

एखादा सुखवस्तू गृहस्थ 'मी स्वस्थ आहे' असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार.

शिष्याच्या भावनाच गुरूला गुरुपद देतात. 
जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्‍गुरू उचलतो. 

ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरू. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्‍गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. 

गुरूने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. 

संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. 
पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. 

आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआपच सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्‍गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. 
केवळ 'गाडी माझी आहे' म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. 
आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो, आणि खड्ड्यामध्ये पडतो. 

सद्‍गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही; 

आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल.
मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. 
असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. 
पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे.

*१८५.  संतचरणी  विश्वास  ।  त्याने  भगवंत  जोडला  खास  ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, July 1, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २ जुलै 🙏

*‌‌।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २ जुलै  🌸*

*गुरुसेवा  करणे  म्हणजे  काय ?*  

साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची ? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करतो ? 
तर देवाची प्राप्ति व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? 
म्हणून, साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; 
नाहीतर त्याचाच अभिमान होतो, आणि मिळवावयाचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. 

जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना.
तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा.
 
गुरुभक्ति करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच होत नसते. गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. 

माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो; 
तेव्हां माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? 

माझ्याजवळ येऊन, मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा. 

तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे.

'मला सर्व कळते' असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. 

ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की, मला सर्व कळते आहे.
 गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की, त्याचे मन आणि आपले मन एकच झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरूपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू.

आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे,
आपले सर्व दुःख मला सांगत जावे. 
तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. 
माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय.

सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. 
ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे.

*१८४.  नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे .*

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*